Monday, 28 August 2017

रायगडचे बांधकाम आणि स्थापत्य..
रायगडवरील पाणीसाठा :- 
 रायगड ही राजधानी. अर्थातच गडावर राबता जास्त असणार. राजघराणे, सरदार घराणे, अष्टप्रधान आणि कुटुंब, नोकर चाकर, शिबंदी, सैनिक, आणि इतरही बाकी. या सगळ्यांसाठी लागणार्‍या पाण्याची सोय ही गडावरच करणे योग्य होत. त्याचबरोबर कधी दुष्काळ पडल्यास, कधी गडाला शत्रुने वेढा दिलाच तर तेवढे दिवस लागणारा अन्न-पाणी साठा हवाच. यासाठी गडावर एक ना अनेक असे जवळपास 10-12 तलाव आणि जवळपास 30 च्या आसपास टाके होती.

"आज्ञापत्र" यातही गडावरील पाण्याचा विशेष उल्लेख आहे तो असा-  "गडावरील आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाहीं आणि ते स्थळ तर आवश्यक बांधणे प्राप्त जालें (झाले) तरी आधीं खडक फोडुन तळीं-टाकीं पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे यैसी मजबुद बांधावी. गडावरी झराहि आहे, जैसे तैसे पाणीही पुरते, म्हणोन तितक्यावर निश्चिंती न मानिंता उद्योग करावा. किंनिम्मित्त कीं, जुझामध्ये भांडियाचे आहे आवाजाखालें झरें स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हा संकट पडतें. याकरिता तसे जागी जखेरियाचे पाणी म्हणोन, दोन चाळ तळीं टाकी बांधोण ठेऊन त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावें".
आज्ञापत्रात असलेल्या या उल्लेखावरूनच  गडावरील पाण्याचे महत्त्व लक्षात येते.  आपण गडावरील काही महत्वपुर्ण तलाव आणि टाक्याची माहीती घेऊ. यातील काही तलाव-टाकी ही आजही अस्तित्वात आहेत(दिसतात), काही दिसत नाहीत. ती दगड, मातीने बुजुन गेलीत.




महादरवाज्या वरील टाकी :- 
रायगडच्या चढणीत वाटेत कुठेही पाण्याची सोय नाही, (रायगडची जीवनकथा या ग्रंथात शां.वि.आवळसकर म्हणतात कि नाने दरवाज्याच्या वर एक टाक होत- मात्र सध्या ते आढळत नाही. पण मार्गाचा विचार करता इथे हे टाक असण स्वाभाविक आहे.) चढणीच्या वाटेत पाणी मिळते ते महादरवाज्यातच. या दरवाज्यावरच्या भागात पाण्याची टाकी आहेत हे बर्‍याच जणांना माहीत नसते. ही टाकी बहुदा महादरवाजाच्या शिबंदी साठीची पाण्याची सोय असावी. याच भागात शिबंदीच्या राहण्याचीही सोय असावी. महादरवाजाच्या वर चढुन समोरच्या डोंगरात बघीतल्यास ही टाकी लक्षात येतात. इथे चार टाकी असुन ती अर्धी खोदीव व अर्धी बांधलेल्या स्वरूपाची आहेत. (श्री. घाणेकर म्हणतात की या टाक्यांचा वापर शत्रु दरवाज्यात आला असता ती फोडुन शत्रुला वाहुन जाण्यासाठी करण्यात येत असावा, मात्र याठिकाणी कुठेही सुरूंगाच्या खुणा दिसत नाही).हे पाणी आजही पिण्यायोग्य आहे.

हत्तीतलाव:-

 (हत्ततलाव) महादरवाजा चढुन वर आल्यावर जो "40 मीटर × 25 मीटर" चा  पहीला तलाव लागतो तोच हा हत्ती तलाव. याच पुर्व नाव "हत्त" म्हणजे 'मृत' (संस्कृत) असाव. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ते हत्ती अस झाल असाव. हत्त याचा अर्थ संस्कृत मध्ये मृत म्हणजे मेलेल अस होत. हे खर असण्याच कारण या तलावात आजही पाणी राहत नाही. गड बांधताना या ठिकाणच्या दगडांचा वापर केला आणि याला तलावाचे स्वरूप देण्यात आला, मात्र दगड काढताना लावलेल्या सुरूंगामुळे यात पाणी राहत नाही असे लक्षात आल्यावर त्याचे नाव हत्त तलाव असे ठेवण्यात आले असावे. या तलावाच्या आतील बाजुस तळापासुन नऊ मीटर उंचीवर काही चित्र कोरलेली आहेत. यात चौरंगासारख्या बैठकीवर एक कलश, त्यात आंब्याची पाने, केळीचे खुंट,  आणि माशांची चित्रे आहेत. (संदर्भ- दुर्गदुर्गश्र्वर रायगड- श्री.घाणेकर.) फोटो देत आहे.



गंगासागर तवाव:-

 गडावरील पाण्याचा सर्वात मोठा स्त्रोत असलेला तलाव म्हणजे गंगासागर तलाव. हा तलाव (120 मी.× 100 )मी आकारचा आहे. हा तलाव बालेकिल्ल्याच्या खालीच आहे. त्यामुळे लगेच नजरेस भरतो. राजाभिषेकास आणलेल सात नद्याच पवित्र जल या तलावात सोडल्यामुळे कदाचित याला हे नाव पडलं असावं. या तलावाच्या आत खांबटाकी आहेत. (पाणी असल्याने ती दिसत नाहीत, मात्र उन्हाळ्यात दिसु शकतील).
या तलावातील गाळ काढताना (सन 7 मे 1987- 28 मे 1987) काही महत्वपुर्ण गोष्टी सापडल्या होत्या. यात एक लाकडी होडी, पाच किलो वजनाचा तवा, एक संपुर्ण व एक अर्धा तोफेचा गोळा, 15-20 शिवराया, दोन मोगली व एक ईस्ट इंडिया कंपनीचे नाने-  पितळी कुंकवाचे तीन करंडे, श्री. खंडोबाची लहान मुर्ती, व 2 तुटलेली कोटबी(पाणी काढायचे भांडे) मिळाली होती.

हनुमान टाक:-
  रायगडच्या लोहखांबाच्या जवळ असलेल हे एक खोदीव टाक.. हे जोड टाक आहे. दगडी भिंतीने या टाक्याचे विभाजन झाल आहे. यालाच चांभार टाके अस पण नाव आहे. याची लाबी तीस फुट(30) रूंद आणि रूंदी आठ ते दहा (8-10) फुट आहे. या टाक्याच्या बाहेरील बाजुला तीन कोनाड्या आहेत, त्यापैकी मधल्या कोनाड्यात हनुमानाची मुर्ती आहे, तीचा पाय मात्र तुटला की तोडला आहे. उजव्या आणि डाव्या बाजुचे कोनाडे रीकामे आहेत.  या टाक्याच्या बाहेरच्या आणि आतल्या बाजुस $ या सारखी चिन्हे आहेत, मात्र हे काय याचा निटसा अंदाज लागत नाही.


काळ टाक:-
छ. शिवरायांच्या समाधीपासुन मागे भवानी टोकाकडे जातानाच्या वाटेवर एक टाक लागत.. यालाच काळ टाके म्हणतात.
याला काळे टाके म्हणतात हे मात्र माहीत नाही.

बारा टाके:-
संख्येने एकुन चौदा असलेली.. पण बारटाकी नाव पडलेली ही टाकी समाधी पासुन भवानी टोकाकडे जाताना जे कोठार आहे त्याच्या जवळ आहे. ही टाकीही खोदीव प्रकारातली आहेत. ही टाकी अंतर्गत जोडलेली आहेत असा समज आहे, पण तो खोटा आहे. या टाक्यांच्या एका दगडावर शरभशिल्प जोडलेल आहे. या टाक्यांची रचना बघता ही टाकी शिवपुर्वकालीन असावी हे नक्की.
 या टाक्यांच्या बाजुलाच आणखी एक तलाव आहे. त्याला वेगळे नाव नाही.

कोळींब तलाव:- 

 नगरपेठे(बाजारपेठ) पासुन वाडेश्वराकडे (जगदीश्वराकडे) जातानाच्या वाटेवर डाव्या हाताला एक मोठ्ठा तलाव आहे.. तोच हा कोळींब तलाव. या तलावाच्या आतल्या उत्तर भागात काही खोदीव लेणी/खोल्या आहेत. त्यात उतरायला पायर्‍या देखील आहेत. या लेण्यांचा / खोल्यांचे बांधकाम बघता हा ही तलाव/ टाक/ लेण/ खोली हे शिवपुर्वकालीन आहे अस लक्षात येते. इथला दगड जलभेद्य म्हणजे (इमपव्हिअस राॅक) आहे.





कुशावर्त तलाव-
नगारखान्यापासुन होळीच्या माळावर जाताना उजव्या बाजुला एक वाट खाली वाघ दरवाज्याकडे उतरते, त्याच वाटेवर एक शिवमंदिर आहे आणि त्याच्याच समोर हा कुशावर्त तलाव आहे. इथेच श्रीगोंदे टोक आहे, काही वाड्यांचे अवशेष आहेत. याच ठिकाणच्या कोणत्याश्या वाड्यात कवी कलश राहत होता.
 गडावर फक्त हिच टाकी किंवा तलाव होते असे नाही.. या व्यतिरिक्त गडावर बराच जलसाठा होता. त्या बद्दल नंतर सविस्तर माहिती देईलच.

टीप :- काही त्रांत्रिक कारणास्तव फोटो देऊ शकत नाही.. लवकरच फोटो उपलोड होतील 




4 comments:

  1. अतिशय माहीतीपूर्ण लेख दादा.. वाचतांना रायगड हळूहळू डोळ्यासमोर उभा रहातो...आणि किती गोष्टी पाहील्याच नाही हे कळते

    ReplyDelete